आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी आता अधिक फायदेशीर पिकांकडे वळू लागले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांमध्ये झाडांची लागवड केली जात आहे. या झाडांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं आहे. देशात अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आढळून येतील.
निलगिरी, थोरशिवणी, सागवान, खैर , महोगनी अशी झाडं अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. या झाडांच्या लागवडीचा आणि देखभालीचा खर्च कमी आहे आणि यातून फायदाही अधिक मिळतो. पण अशा पद्धतीने झाडांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी धीर धरणं गरजेचं आहे. अन्यथा अशा पद्धतीची शेती विशेष फायदा करून देणार नाही.
निलगिरी
निलगिरीच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, इंधन तसंच कागदाचा लगदा बनवण्यासाठी केला जातो. आजतकने दिलेल्या माहितीनुसार, एक हेक्टर क्षेत्रामध्ये युकेलिप्टसची तीन हजार झाडे लावता येतील. ही झाडे फक्त ५ वर्षांमध्ये चांगल्या प्रमाणावर बहरतात आणि त्यानंतर त्यांना कापलं जातं. एक हेक्टरमध्ये ही झाडे लावून शेतकरी सहज ७० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकतो.
महोगनी
महोगनीची झाडं पूर्ण बहरण्यासाठी, विकसित होण्यासाठी १२ वर्षे लागतात. या झाडाच्या लाकडापासून ते अगदी पानं आणि पाला पाचोळ्याचा वापर अनेक गंभीर आजारांच्या उपचारासाठी केला जातो. या झाडाची पानं आणि बियांचा वापर करून डास मारण्यासाठीची औषधं तयार केली जातात, तसंच कीटकनाशक बनवण्यासाठीही या झाडाचा वापर केला जातो. या झाडाच्या बिया बाजारात प्रति किलो एक हजार रुपयांना विकल्या जातात.
सागवान
सागवानाची झाडं १२ वर्षांनी कापली जाता. सागवानाचं एक झाड एकदा कापल्यावर पुन्हा एकदा वाढतं आणि पुन्हा एकदा कापलं जातं. जर एका एकरामध्ये सागवानाची ५०० झाडं लावली, तर १२ वर्षांनंतर या झाडांची किंमत कोट्यवधी रुपये होईल.
खैर
कोकणात व जेथे जास्त पाऊस आहे. अशा ठिकाणी खैराचे कुंपण उपयुक्त ठरते. खैराचा काटा हा अतिशय टोकदार असतो. खैराचे उपयोग म्हणजे खौराजे सालीपासून कात बनवायचा कोकणामध्ये कुटीरोद्योग/लघुउद्योग आहे. चांगला दर्जेदार कात हा खैराच्या लाकडापासून केल्यास त्याला भाव चांगला मिळतो. म्हणून खैराची लागवड अती पाऊस पडणाऱ्या भागात सागापेक्षा फायदेशीर ठरते. खैर तोडताना मात्र जंगल खात्याची परवानगी लागते.