गंधक – पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते. अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि जमिनीतील सामू नियंत्रित करण्यात गंधक महत्त्वाचे आहे.
गंधक म्हणजेच सल्फर. बुरशीनाशक, कोळीनाशक म्हणून गंधकांचा वापर होतो. विविध खतांमधून सल्फेट या संयुगाच्या स्वरूपात गंधक आता उपलब्ध झाले आहे. सल्फेट ऑफ पोटॅश हे दाणेदार पोटॅशयुक्त खत बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये गंधकाचे प्रमाण दहा टक्के असते. शंभर टक्के पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूपातील गंधक ही बुरशीनाशक म्हणून बाजारामध्ये उपलब्ध आहे.
गंधकामुळे जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकविण्यास मदत होते. कृषिमालाच्या गुणवत्तेत वाढ होते. गंधकाला भूसुधारक असे म्हणतात. त्याचे कारण म्हणजे गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जमिनीतून गंधकयुक्त खतांचा वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद आणि खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनाची भरीव वाढ होते. गंधकासोबत इतर अन्नद्रव्यांचा वापरामुळे आंतरपीक प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होऊन शेतीमालाचे उत्पादन वाढण्यास व प्रत सुधारण्यास मदत होते.
जर तुमच्या पिकला ६ किलो नत्र (१४.६ किलो युरिया) लागत असेल तर कमीत कमी १ कलो गंधक लागेलच. इतके गंधक का लागते व आज पर्यंत याची इतकी गरज का भासली नाही हा प्रश्न आपल्या मनात उभा रहाणे साहजिक आहे.
आजपर्यंतच्या शेतीच्या पद्धतीत जमिनीची धूप कमी व्हायची. शुद्ध खतांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हता. कमी उत्पादकतेची पिके घेतली जात होती व सर्वात महत्वाचे म्हणजे कंपोस्ट चे प्रमाण खूप होते. आपल्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाल्याने गंधकाचा वापर वाढवणे क्रमप्राप्त आहे.
पिकातील गंधकाची कमतरता सहज दिसून येते. पिकाची वाढ खुंटते, ते कमजोर दिसते (टेकू द्यावे लागतात), पाने पिवळी पडू लागतात, मुळांवर (द्विदलवर्गीय पिकात) गाठी कमी असतात, दाणे भरण्यास वेळ लागतो व फळे पूर्णपणे पिकत नाहीत.
पिकपोषणा पलीकडे देखील गंधकाचे दोन महत्वाचे फायदे आहेत. पहिला म्हणजे बुरशी व लाल कोळी नियंत्रणाचा व दुसरा उपयोग म्हणजे भूसुधार. अर्थात या साठी एलेमेंटल स्वरूपातील गंधक वापरावे लागते. (या बद्दल अधिक माहिती खाली देत आहे.)
गंधकासाठी कोणकोणती खते द्यावीत, त्यात गंधकाचे प्रमाण किती, त्यातील गंधक किती वेळेत उपलब्ध होईल हे जाणून घेवू.
सल्फरयुक्त खते:- अमोनिअम सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण २३ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते. एक किलो गंधकाचा पुरवठा करण्यासाठी ४.३५ किलो अमोनिअम सल्फेट लागेल.
- सिंगल सुपर फोस्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण ११ टक्के, लगेच लागू होते, जमिनीतून द्यावे.
- पोटाशियम सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १७.५ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते.
- झिंक सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १० टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते.
- मॅग्नेशियम सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १७ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते.
- फेरस सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १०.५ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते.
शुद्ध सल्फरयुक्त खते
- बेन्टोनाईट सल्फरमध्ये गंधकाचे प्रमाण ९० टक्के असते. खूप हळू लागू होते. मातीतून द्यावे लागते. एकरी डोस २० ते २५ किलो चा असतो.
- डब्ल्यूडीजी सल्फरमध्ये गंधकाचे प्रमाण ८० किंवा ९० टक्के असते. वेगाने लागू होते. मातीतून द्यावे लागते. एकरी डोस ३ किलोचा असतो. याचा उपयोग फवारणीतून केल्यास बुरशीनाशक व लाल कोळी नाशकाचे काम करते.
- उपाय –
पिकात गंधकाची कमतरतेची लक्षणे दिसत असतील तर ती दूर व्हावी म्हणून पिकाच्या वाढीच्या गरजे नुसार विद्राव्य स्वरूपातील गंधक युक्त खते फवारावीत व ड्रीप ने किंवा आळवणीने डब्ल्यूडीजी स्वरूपातील खते ३ किलो प्रती एकर या दराने द्यावे. हे पिक काढल्यावर पुढील पिकाची तयारी करते वेळी बेन्टोनाईट सल्फर एकरी २० ते २५ किलो द्यावे.
कुठलेही पिक घ्या, गंधकाचा वापर नक्की करा. एका वेळी एकरी ३ किलो डब्ल्यूडीजी सल्फर चा डोस हे प्रमाण नियमित ठेवा. पहिला डोस पिक वाढीला सुरवात झाली कि, दुसरा डोस पिक ऐन जोमात असताना व तिसरा डोस फळ/दाणे भरू लागल्यावर.
गंधकाचे पिकांमधील कार्य –
1) गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चांगली चालना मिळते.
2) गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे. तसेच सिस्टीन, सिस्टाईन व मिथीनोओतीत या आवश्यक जमिनी आम्लांचा एक घटक आहे.
3) गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते. त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये वाढ करण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिरीकरण्यात मदत करते, विविध विकार व चयापचयाच्या क्रियेला मदत करते.
4) भुरीच्या नियंत्रणासाठी गंधकाचा 80 टक्के वेटेबल पावडर म्हणून वापर होतो, कोळीनाशक म्हणूनही त्याचा वापर होतो.
5) गंधकामुळे हरितद्रव्य निर्मितीत आणि प्रकाश संश्लेषणामध्ये वाढ होते. प्रथिनांचे प्रमाण वाढते. फळांमधील विद्राव्य पदार्थांचे प्रमाण वाढते.
जमिनीमध्ये गंधकाच्या कमतरतेची कारणे –
1) मातीच्या ऱ्हासामुळे आणि निचऱ्याद्वारे होणारी गंधकाची कमी.
2) गंधकविरहित अथवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर.
3) जमिनीतून पिकांद्वारे सातत्याने, गंधकाचे होणारी उचल.
4) शेतातील पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडी कचऱ्याचे चक्रीकरणातून होणारा कमी वापर.
गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये आढळून येणारी लक्षणे –
1) पिकांची वाढ खुंटते, पीक कमजोर दिसते. नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडू लागतात.
2) द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरणाच्या प्रमाण कमी होते. तृणधान्य वर्गीय पीक परिपक्व होण्यास उशीर लागतो. फळे पूर्णपणे पिकत नाहीत.